रत्नागिरीत काँग्रेसच्या ओबीसी सेलच्यावतीने आयोजित मेळाव्यात बोलताना नाना पटोले म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने व्यवस्थेची वाट लावली असून ईडीचा वापर केवळ त्रास देण्यासाठी सुरू आहे. सन २०२४ च्या निवडणुकीत केंद्रातील या सरकारला हद्दपार करूया. काँग्रेसच्या ओबीसी सेलने सर्व ओबीसींना एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे.
या मेळाव्याला ना. सुनील केदार, माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, दीपक राऊत, अशोक जाधव, बाळा मयेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, नवीनचंद्र बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
मेळाव्यानंतर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु, कॉंग्रेसचे नेते रत्नागिरीमध्ये विलंबाने दाखल झाल्याने, मोर्चा रद्द करण्यात आला. त्यामुळे मग काँग्रेस भुवन येथील मेळाव्याला जाण्यासाठी विश्रामगृहातून ते काँग्रेसभवन पर्यंत प्रदेशाध्यक्षांनी ओपन जीपमधून रॅली काढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांचे बारीक लक्ष सर्व कार्यक्रमावर होते. त्यामध्ये पटोले यांनी ज्या ओपन जीपचा वापर केला त्यांना नंबर प्लेटच नव्हती. आणि कागदपत्रांची चौकशी केली असता, चालकाकडे कागदपत्रे देखील नसल्याने त्याला ५८०० रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.
पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्रात काँग्रेस सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी इंम्पिरिकल डाटा तयार करवून घेतला होता. परंतु भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी ओबीसींना संपविण्याचा घाट घातला आहे. केंद्राने इंम्पिरिकल डाटा न दिल्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेले. निवडणुका आल्यानंतर जातीयवाद निर्माण करून त्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा नवा फंडा भाजपने सुरू केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.