इंडिया हा २७ पक्षांचा नवा गट केंद्रातील मोदी सरकारला जोरदार टक्कर देईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. चिपळूण शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी नुकतेच आपल्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला. ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर चिपळूण शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची बैठक आज चिपळूण शहरातील चितळे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, जिल्हा समन्वयक मंगेश शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत, राजू देवळेकर, रूमा देवळेकर, मानसी भोसले आदी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना खासदार राऊत म्हणाले, चिपळूणमधून किती गेले किती राहिले हे तपासण्यासाठी नव्हे तर आपल्या पक्षाच्या नियमित उपक्रम, कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आजची बैठक आहे. जे कुणी गेले ते गेले. अनेक दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे आज ना उद्या हे होणार होते; मात्र इथे कसलीही चिंता नाही. हे गर्दीने फुलून गेलेले सभागृह इथली शिवसेना भक्कम असल्याची साक्ष देत आहे. आपल्या भाषणात त्यांनी मणिपूर, लोकसभेतील पंतप्रधानांची उपस्थिती, भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. इंडिया हा २७ पक्षांचा नवा गट केंद्रातील एनडीएला येणाऱ्या काळात जोरदार टक्कर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद विजय मिळवून देऊ, असेही त्यांनी शहराला आश्वस्त केले. राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली.