चिपळुणातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांशी भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी संवाद साधताना चौकशी केली असता, कोकणासाठी विशेष पॅकेज केंद्र सरकारने जाहीर करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी निलेश राणे यांच्याशी चर्चा करताना केली. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्याने , ते कोकणासाठी नक्कीच प्रयत्नशील आहेत, आणि याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे जातीने प्रयत्न करीत आहेत, अशी माहितीही श्री. राणे यांनी यावेळी दिली.
व्यापारी आणि नागरीकांशी संवाद साधत त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत चिपळुणात पुन्हा पूरस्थिती उद्भवू नये यासाठी, कोणत्या उपाय योजना आखाव्या लागतील, काय नियोजन करावे लागेल याबाबत चर्चा मसलत केली. यावेळी व्यापाऱ्यांनी मिळालेली शासकीय मदत ही खूपच तुटपुंजी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय मदतीसह इन्शुरन्स कंपन्यांच्या भूमिकेबद्दलही सविस्तर माहिती जाणून घेतली. येथील इन्शुरन्स कंपन्या अजूनही नुकसान परतावा देण्यासाठी आम्हाला त्रास देत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
पुरामध्ये अनेक कागदपत्रे वाहून गेली, खराब झाली पण याचा मदतपूर्वक विचार न करता, इंशुरन्स कंपनी कागदपत्रे किंवा इतर काही कारणे सांगून, इंशुरन्सची रक्कम मिळवून देण्यास विलंब करत आहे, त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला व्यापारी यामुळे त्रस्त झाला आहे, आणि तशी मागणी निलेश राणे यांच्याकडे केली आहे. त्यावर भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी रोखठोक सांगितले कि, इन्शुरन्स कंपन्यांना तुमची भाषा समजणार नाही, आता आम्हाला आमची भाषा सांगावी लागेल. त्यांना त्याच भाषेत समजेल, अशी स्पष्टोक्ती व्यापाऱ्यांना यावेळी दिली.