रत्नागिरी मधील दि यश फाउंडेशन, परकार हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेजच्या ६२ तृतीय वर्षाच्या मुलींना कोविड काळामध्ये मानधन तत्वावर सेवेत सामावून घेण्यात आले होते. कोरोनाचा जिल्ह्यातील विळखा बघता, आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालेला असताना, आरोग्य सेवेला बळकटी येण्यासाठी या तिसऱ्या वर्षाच्या परिचारिकांना मानधनावर नियुक्त करण्यात आले परंतु, त्यांचा दोन महिने पगारच न झाल्याने आत्ता त्यांनी आपले काम थांबवले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात परिचारिकांनी काम थांबविल्याने रत्नागिरीतील महिला रुग्णालयावर त्याचा परिणाम झाला आहे. येथील एक विभाग बंद पडल्याने गैरसोय निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही, दररोजच्या बाधित संख्येमध्ये थोडी संख्या कमी झालेली दिसून आली असली तरी, कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत होता त्यावेळी, कोविड सेंटरसुद्धा कमी पडू लागलेली,तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झालेला. बाधित रुग्णांना वेळेवर आणि योग्य ती सेवा मिळावी यासाठी जिल्हा शासनाने विचार विनिमय करून, काही नर्सिंग कॉलेजच्या प्रशिक्षणार्थीना जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन, आरोग्य सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळामध्ये मागील २ ते ३ महिने ६२ नर्सची खूपच मदत झाली.
या रुग्णांची मोठ्या प्रमाणत गैरसोय होत असल्याने, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना विचारणा केली असता, कोरोनाचा अति फैलाव झालेला असताना रत्नागिरीतील काही नर्सिंग कॉलेजच्या नर्सना प्रशिक्षण देऊन दोन महिन्यासाठी सामावून घेतले होते. त्यांचा कालावधी संपल्यामुळे त्यांनी काम थांबवले असून, त्यांच्या पगाराचा विषय प्रक्रियेत असून लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.