रत्नागिरी तालुक्यातील पी.एम. किसान निधी योजनेंतर्गत १९ हजार ६५४ शेतकर्यांनी ई केवायसी अद्याप केलेली नाही. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी केली नाही, तर त्यांना पुढील लाभ दिले जाणार नाहीत, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या पी.एम. किसान सन्मान योजनेतून शेतकर्यांना वर्षाला ६००० रुपये मिळत आहेत. या योजनेतून लाभार्थ्यांना अकरा हप्ते मिळाले आहेत. पी. एम. किसान लाभार्थी यांच्या माहितीत काही त्रुटी असल्याने केंद्र शासनाने लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र शासनाने ई केवायसी करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत ठेवली होती. पण अद्यापही सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्याने आता ३१ ऑगस्ट ही ई केवायसी करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. जे लाभार्थी ई केवायसी करणार नाहीत, त्यांना या योजनेचा १२ वा हप्ता मिळणार नाही. रत्नागिरी तालुक्यात पी. एम. किसानचे आधार पडताळणी झालेले २९ हजार ६५० लाभार्थी आहेत. त्यामध्ये ८ हजार ३७८ लाभार्थीनी ई केवायसी केली. फक्त २८ टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे.
लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.