रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीची मतमोजणी रविवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्यो आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण १ लाख ६० हजार ४६८ मतदारांपैकी १ लाख ९ हजार ४२६ मतदारांनी यामध्ये महिला मतदारांचा सहभाग आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिला आहे. सर्वाधिक मतदान गुहागर (७५.२६ टक्के) आणि राजापूर (७४.५५ टक्के) येथे झाले, तर रत्नागिरी शहरात सर्वात कमी म्हणजे ५५.०९ टक्के इतके मतदान झाले. दरम्यान, रत्नागिरी नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १० मधील मतदान न्यायालयीन अपिलामुळे लांबणीवर पडले असून, तेथील मतदान २० डिसेंबर रोजी ४ केंद्रांवर घेतले जाणार आहे. रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने शहरांनुसार स्वतंत्र ठिकाणे आणि टेबलांची व्यवस्था केली आहे.
रत्नागिरीसाठी नगरपरिषद कार्यालयातील संत गाडगेबाबा सभागृहात १६ टेबलांवर, तर चिपळूणसाठी युनायटेड इंग्लिश स्कूलमधील गुरुदक्षिणा सभागृहात १४ टेबलांवर मतमोजणी होईल. खेड आणि राजापूरसाठी प्रत्येकी ५, लांजासाठी ७, देवरुखसाठी ९ आणि गुहागरसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकृत निकाल जाहीर केले जातील. सुरक्षेच्या दृष्टीने मतपेट्या ठेवण्यात आलेल्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये एसआरपी आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा आणि स्ट्रक्चरल ऑडिटसह सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र माध्यम कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

