राजापूरमध्ये अवतरणाऱ्या गंगेच्या प्रवाहाबाबत अनेकांच्या धार्मिक भावना गुंतलेल्या आहेत. मे महिन्यामध्ये गंगा अवतरली असून गंगामाईचे १६६ दिवसानंतरही वास्तव्य कायम आहे. त्यानंतर पावसाळा, शेतीच्या कामामध्ये गुंतलेले शेतकरी आणि सुरू झालेल्या शाळा या सार्या स्थितीमध्ये गंगास्थानी येणार्या भाविकांच्या संख्येमध्ये घट झाली होती. मात्र दिवाळीच्या हंगामात पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने पर्यटनाला बहर आला आहे.
मे महिन्यामध्ये आगमन झालेल्या गंगातीर्थ क्षेत्राला राज्यासह परराज्यातील एक लाखाहून अधिक भाविकांनी भेट देवून गंगास्नानाची पर्वणी साधली आहे. सद्यस्थितीमध्ये मूळ गंगा, काशिकुंड, गायमुख आणि सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती गंगा देवस्थानचे पदाधिकारी श्रीकांत घुगरे यांनी दिली.
गंगा आली कि पाऊस लांबतो, अशी जुन्या जाणकार मंडळींची धारणा आहे. पावसाळ्यानंतर गंगा तीर्थक्षेत्री पवित्र गंगा स्नानासाठी येणार्या भाविकांची संख्या रोडावली असली तरी, दिवाळी सुट्टी निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनार्यासह विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी येणार्या पर्यटक आणि भाविकांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. त्यातून, पर्यटन फुले लागले असून या ठिकाणी येणार्या पर्यटकांची पाऊले गंगा तीर्थक्षेत्राकडे वळतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शहरानजीकच्या उन्हाळे येथील तीर्थक्षेत्री गंगामाईचे होणारे आगमन आणि वास्तव्याचा काळ भाविकांच्या दृष्टीने एक धार्मिक पर्वणी असते. त्यामुळे गंगामाईच्या वास्तव्याच्या काळात विविध राज्यातील भाविक या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येतात. मात्र कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेक भाविकांनी गंगास्नानाची ही पर्वणी साधता आलेली नव्हती. अशा स्थितीमध्ये गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गंगामाईचे साधारण अडीच-तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये गंगामाईने निर्गमन झाले होते. त्यानंतर ७५ दिवसानंतर १५ मे रोजी पुन्हा एकदा गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. ही गंगा अजूनही प्रवाही राहिली आहे.