रत्नागिरी शहरी भागाला पाणी पुरवठा प्रकरण बरेच दिवस चांगलेच गाजत आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तीन ठिकाणी एकाच वेळी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. आधीच शहराला पाणी टंचाईची झळ बसून एक दिवस आड पाणी पुरवठा होत असल्याने नगर पालिकेच्या गलथानपणाचा फटका पुन्हा एकदा बसला.
अनेक दिवसापासून नव्या नळपाणी योजनेचा फटका रत्नागिरीकरांना बसतच आला आहे. अद्याप या योजनेचे काम पूर्णत्वाला गेलेले नाही. त्यामुळे अजून सुद्धा जुन्या योजनेवर अर्धेअधिक शहर अवलंबून आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल धरणातील पाणी साठा संपल्याने शहराला सध्या शीळ धरणावर अवलंबून रहावे लागत आहे. शहरातील साळवीस्टॉप येथून पेठकिल्ला येथील टाकीमध्ये अद्यापही जुन्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे.
मंगळवारी रात्री टाकीत पाणी सोडण्यात आल्यावर पाण्याच्या दाबाने बँक ऑफ इंडिया मारुती मंदिर शाखा, स्व.शामराव पेजे पुतळ्यासमोर व जिल्हा परिषदसमोर अशा तीन ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने मोठ्याप्रमाणात पाणी वाया जात होते. बुधवारी दिवसभर नगर पालिका कर्मचारी पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी दुरुस्ती करीत होते. या कामासाठी दोन दिवस लागणार असल्याचे नगर पालिका पाणी विभागाचे कर्मचारी भोईर यांनी सांगितले. आधीच पाणी एक दिवस आड मिळत असून अशा पध्दतीने हजारो लीटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांमधून न.प. अनागोंदी कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.