रत्नागिरीमध्ये कोरोना लसीकरणाला वेग येण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन प्रयत्न करत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. विविध वयोगटानुसार लसीकरण मोहीम सर्वत्र सुरु आहे. शासनाने आजवर ४५+ लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य दिले असल्याचे पाहण्यात आले. त्यामुळे १८+ वयोगट कोरोना लसीकरणापासून वंचित राहिला आहे.
१८+तरुणांच्या लसीकरणा संबंधी हि अडचण लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी स्वत:च्या आमदार निधीतून तरुणांचे लसीकरण पार पाडण्याचे ठरविले आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना ना. उदय सामंत यांनी सांगितले कि, या लसीकरणामध्ये अनेक जणांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले होते, टीकाही मोठ्या प्रमाणात झाल्या. रत्नागिरी नगरपालिकेने आजपर्यंत शहरातील ६०+ वयोगटातील नागरिकांसाठी राबविलेल्या लसीकरण मोहिमेमुळे एक आदर्श निर्माण केला आहे.
सरकारने आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, १८ ते २९ वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाची मात्र अजून काही माहिती प्रदर्शित झालेली नाही. म्हणून या वयोगटातील तरुणांचे लसीकरण माझ्या आमदार निधीतून २५ लाख रुपये रत्नागिरी नगरपालिकेकडे देणार आहे आणि यामधून सुमारे २५,००० डोस मतदारसंघातील १८ ते २९ वयोगटातील तरुणांना देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेची सुरुवात २७ जूनपासून करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडू नये यासाठी मुंबईहून स्पेशल टीम येणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली. लसीकरणामध्ये सर्वप्रथम शहरातील ३,५०० तरुणांना डोस देण्यात येणार आहे.