दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरातील रस्ते पुन्हा खड्डयात गेले आहेत. गणेशोत्सवापूर्वी पालिकेने रस्त्यातील खड्डे भरले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाने पालिकेच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. रस्ते खराब झाल्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. मारुतीमंदिर, काँग्रेस भुवन, आठवडाबाजार, रामआळी, रहाटाघर येथे पडलेल्या खड्ड्यामधून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसात रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डयात होते. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन गणेशोत्सवापूर्वी पालिकेने सप्टेंबर महिन्यात खड्डे बुजवले. हे खड्डे जांभ्या दगडाने भरण्यात आले होते. गणपती विसर्जनानंतर दोनच दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. मारुतीमंदिर सर्कलला वाहन चालकांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी सातत्याने खड्डे पडत आहेत. रस्त्याचे काम झाल्यानंतर मारुती मंदिरचे हे वळण अगदी व्यवस्थित करण्यात आले होते. त्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले.
शहरात अन्य भागातही प्रचंड खड्डे पडल्याने वाहने चालवणे कठीण झाले आहे. रहाटाघर येथे अवजड वाहन आणि एसटीची वर्दळ जास्त प्रमाणात असते. सखल भाग असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचते आणि खड्डे पडत आहेत. पटवर्धन हायस्कूलच्या मागील बाजूस मोठे खड्डे पडले असून अशीच परिस्थिती शहरातील तेली आळी, पटवर्धन हायस्कूल, गोखले नाका, शेरेनाका, टिळक आळी, बंदर रोड, काँग्रेस भुवन, रामआळी येथेही आहे. गणेशोत्सवापूर्वी पालिकेने केलेल्या खड्डेभरणीची या पावसाने पोलखोल केली आहे. त्यामुळे पालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.