केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा २३ ते २५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात चालू आहे. सदर यात्रे दरम्यान काल २३ ऑगस्ट २०२१ रोजी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांबद्द्ल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटून कायदा भंग करण्यात आला. तसेच आगामी कालावधीत ३० ऑगस्ट २०२१ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व ३१ ऑगस्ट २०२१ रोजी गोपाळकाला असे उत्सव साजरे होणार आहेत.
वरील सर्व उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्हयात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर लागू शकण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्हादंडाधिकारी , रत्नागिरी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार मिळालेल्या अधिकारान्वये दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वा. पासून ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.
शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे आणि लोकांत प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा प्रतिकृती यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.
अंतयात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, लग्नसोहळा, , शासकीय सेवेत तैनात कर्मचारी या बाबतीत वरील आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळामध्ये संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते व जर अशी लेखी परवानगी घेतली तरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेशत नमूद केले आहे.