रत्नागिरी तालुक्यातील उद्योगमंत्री उदय सामंत यांचे होमपीच समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी, शिंदे सेनेच्या कामगिरीमुळे या गटाला चांगलाच घाम फोडला. एकूण २२ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे सेनेने तर १० ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने दावा केला आहे. अल्पावधीतच शिंदे सेनेने, ठाकरे सेनेच्या बरोबरीने यश मिळवले. उर्वरित ५ ग्रामपंचायतींवर भाजपे वर्चस्व राखले आहे.
मावळंगेत भाजपला, टेंभ्ये, फणसवळेत शिंदे गटाला तर निवेंडी ठाकरे गट या प्रस्थापितांना मोठा धक्का बसला. या ठिकाणी सत्ता पालट झाला तर मालगुंड ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाने जोराची टक्कर दिली.
वर्षाच्या सुरुवातील शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक लागली आहे. या आधी ९० टक्केच्यावर ग्रामपंचायती घेणारी ठाकरे सेना आता ६० टक्क्यावर आली आहे. पक्षाच्या विभाजनाचा मोठा फटका सेनेला बसला आहे. नवीन उभ्या राहिलेल्या शिंदे गटाची कमी कालावधीतच जोरदार घोडेदौड सुरू झाली आहे. निकालानंतर ठाकरे सेनेने कासारवेली, चांदोर, तरवळ, पूर्णगड, फणसवणे, टीके, तोणदे, टेंभ्ये, मालगुंड, भगवतीनगर, मावळंगे याचबरोबर बिनविरोध झालेल्या बोंडे, करबुडे, निरूळ या १४ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
तर पिरंदवणे, धामणसे, निवळी, चाफेरी, गावडेआंबेरे या ५ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला आहे. उर्वरित १० ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने दावा केला आहे. लवकरच दोन्ही पक्ष आपल्या सरपंचांसह ग्रामपंचायतींची नावे जाहीर करणार आहेत. त्यामुळे नक्की कोणत्या पक्षाचे वर्चस्व जास्त आहे हे लक्षात येईल.