केंद्रीय मंत्री नारायण राणे मागील आठवड्यामध्ये जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरीच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी अनेक स्थानिक उद्योगांच्या बाबतीत स्थानिक व्यापार्यांना स्थैर्य लाभून, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री राणे यांनी रत्नागिरीमधील उद्योजकांना दिले आहे.
१९९२-९३ सालच्या दरम्यान रत्नागिरी एमआयडीसी परिसरात स्टरलाइट कंपनीचा तांबे निर्मिती प्रकल्प सुरु झाला होता. कंपनीने त्यासाठी २०८ हेक्टर जागाही संपादित केली होती. परंतु या प्रकल्पामुळे प्रदूषण निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकणार असल्याने स्थानिक आंबा उत्पादनावर त्याचा अनिष्ट परिणाम होईल, या भीतीने स्थानिक जनतेने या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला. त्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलनही केले. परिणामी कंपनीने हा प्रकल्प रत्नागिरीतून रद्द करून तामिळनाडूमध्ये स्थलांतरित केला.
प्रकल्प रद्द होऊनही करारानुसार संपादित जागा अजूनही कंपनीच्याच नावे असून, त्यावर अद्याप कोणताही उद्योग उभारला गेला नसल्याने गेली ३० वर्षे ही जागा विनावापराची फक्त पडून आहे. म्हणून भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हा कामगार आघाडीतर्फे रत्नागिरी एमआयडीसीमधील स्टरलाइट कंपनीच्या ताब्यात वापराविना पडून असलेल्या ५०० एकर जमिनीवर पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प आणून स्थानिकांना रोजगार द्यावा, अशा आशयाचे निवेदन केंद्रीय मंत्री राणे यांच्या कोकण दौऱ्यामध्ये देण्यात आले.
या जागेवर स्टरलाइट कंपनीच्या माध्यमातूनच किंवा सदर कंपनी इच्छुक नसल्यास अन्य कंपनीला जमीन हस्तांतरित करून, कोकणच्या पर्यावरणाला पूरक असा उद्योग उभारून , यासाठी भाजप कामगार आघाडीने पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर, जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर आणि मनोज पाटणकर यांनी तयार केले. सध्या यातील काही जागेत कचरा डम्पिंग केला जात आहे, तर काही भाग चंपक मैदानासह उर्वरित जागा रिकामीच आहे.
नारायण राणेंच्या केंद्रात मंत्रीपदी लागलेल्या वर्णीमुळे यांच्या माध्यमातून कोकणासह राज्य आणि देशाची औद्योगिक भरभराटच होईल अशी खात्री असून त्यांच्या माध्यमातून रत्नागिरीतील स्टरलाइट कंपनीच्या जागेवर पर्यावरणपूरक मोठा प्रकल्प उभारल्यास, रत्नागिरीच्या स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष भडकमकर यांनी व्यक्त केला.