रत्नागिरी मध्ये सद्य स्थितीला एकही अद्ययावत रुग्णालय नसल्याने, बऱ्याच वेळा कठीण प्रसंगी अतिगंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर अथवा मुंबई, पुणे येथे हलवण्यास सांगितले जाते. इथे त्यांना उपयोगी पडणारी अद्ययावत यंत्रणा नसल्याने, रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतु शकतो त्यामुळे योग्य उपचार मिळण्यासाठी तुम्ही दुसरीकडे हलवा असे सरळ रुग्णालयातून सांगितले जाते. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. अनेक कोकणातील नेते केंद्रात मंत्री असून सुद्धा कोकणच्या पोटी कायम निराशाच आली आहे.
एखाद्या रुग्णाला उपचारासाठी मोठ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते यामध्ये त्याचा वेळ आणि पैसे खर्च व्हायचे याचे शल्य रत्नागिरी शहरातील पावस रोड येथे गोळपसडा या ठिकाणी असलेल्या मजलिस फलाहदारैन या मदरसा मधील व्यवस्थापन समितीला होत होते. यासाठी या मदरसेच्या भव्य जागेत एक हॉस्पिटल उभे करावे असा मानस त्यांनी बांधला आणि म्हणूनच या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारुन त्याचा शुभारंभ शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी.एन पाटील उपस्थित होते.
३० बेडच्या या हॉस्पिटलमध्ये ४ आयसीयु बेड असून नामांकित आणि अनुभवी डॉक्टर या ठिकाणी २४ तास उपलब्ध असणार आहेत. सर्व सोयींनी सुसज्ज असे हे हॉस्पिटल असून मोठ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये असणार आहेत. आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक खर्चात या ठिकाणी उपचार होणार असून नागरिकांनी या सोयीचा फायदा घेण्याचे आवाहन हॉस्पिटल च्या व्यवस्थापन समितीने केले आहे.