रत्नागिरी शहरामधील साळवी स्टॉप येथे नगरपालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. त्याची दिवसाला सुमारे १५ एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे, आत्ता नवीन ३ विद्युत पंप बसविल्याने त्याची क्षमता वाढली असून ती १८ एमएलडी पाणी शुद्ध होत आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्याची दुरुस्तीच करण्यात आलेली नसल्याने जलशुद्धीकरणाचा दर्जा काही प्रमाणात घसरला होता.
परंतु, आत्ता रत्नागिरी नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे रुपडे पालटले असून, नाम. उदय सामंत यांच्या हस्ते या नुतनीकरण झालेल्या केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. इतक्या वर्षानंतर प्रथमच या केंद्राची चहु बाजूंनी दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी आता शहरवासियांना वितरित करण्यात येत आहे.
अत्याधुनिक फिल्टरहाऊस बनल्याने १०० टक्के शुद्ध पाणी आता शहरवासियांना मिळणे शक्य झाले आहे. नगरपालिकेने वॉटर चॅनल, फ्लॅश मिक्सर, फिल्टर बेल्ट, बॅकवॉश युनिट, एरिएशन फाउंटन दुरुस्ती,, व्हॉल्व्ह, क्लोरिन युनिट अशी यांत्रिक व विद्युत दुरुस्तीवर दोन कोटी रुपये खर्च करून पालिकेचे अत्याधुनिक फिल्टर हाऊस बनवला असून संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती केली आहे.
खराब पाण्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्यावर बेतण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांसह सर्व नगरसेवक, पाणी अभियंता अविनाश भोईर, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी तातडीची एकत्रित बैठक घेऊन यावर मार्ग शोधला आणि स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. या वेळी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रमोद शेरे, संजय साळवी, बिपिन बंदरकर, निमेश नायर आदी उपस्थित होते.