रत्नागिरी नगरपरिषदेने सध्या घरपट्टी वसूल करण्याचे काम सुरु केले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये अकरा कोटीची घरपट्टी वसुल करायची शिल्लक आहे. वसुली पथकाने शर्थीचे प्रयत्न करून देखील आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपये वसूल केले आहेत. मात्र आता हे आर्थिक वर्ष संपायला काही महिनेच शिल्लक राहिल्याने पालिका प्रशासनाने नोटीसा काढुन घरपट्टी थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नगर परिषदेच्या घंटा गाडीवरुन घरपट्टी भरा, कटू कारवाई टाळा अशा प्रकारच्या वारंवार सूचना देऊन देखील अनेक इमले धारकांकडून घरपट्टी वेळेत भरली जात नाही आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर पालिकेपुढे घरपट्टी वसुलीचे मोठे संकटच उभे ठाकले आहे. रत्नागिरी पालिकेचे शहरातील एकूण २९,०८८ च्या आसपास इमलेधारक आहेत. त्यांच्याकडुन सुमारे सहा कोटीच्या घरात घटपट्टी वसूल होते.
मात्र गेल्या दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे, लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवहार, उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले. त्याचप्रमाणे संचारबंदी असल्याने नागरिकांना कामासाठी सुद्धा घराबाहेर पडता येत नव्हते. लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्राला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे, यामध्ये रत्नागिरी नगर पालिकेचाही समावेश आहे.
रत्नागिरी पालिकेच्या घरपट्टीवर याचा परिणाम झाला. त्यामुळे गेल्या वर्षी आणि या वर्षीची अशी एकुण ११ कोटीची घरपट्टी थकीत आहे. पालिकेच्या वसुली पथकाकडे इमलेधारक घरपट्टी देण्यास टाळाटाळ करून वेळ मारून नेत आहेत. मार्च २०२२ पूर्वी ही वसुली होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने घरपट्टी थकविणाऱ्या सर्वानाच नोटीस बजावून पैसे भरण्यासाठी काही कालावधी दिला आहे. त्या दरम्यान जर घरपट्टी भरली नाही, तर मात्र कारवाई करून संबंधिताचे इमले जप्त करण्यात येणार आहेत, असा इशारा वसूली पथकाने दिला आहे.
थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायिक, वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे टॉवर, काही बॅंकाच्या जागा भाड्याने घेतलेल्या आहेत त्यांचा देखील यात समावेश आहे. यांच्याकडुन लाखोचा कर वसुल होतो. त्यांनाही कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक देखील आता घरपट्टी भरण्यास पुढे येत आहेत. गेल्या दोन दिवसात लाखोची घरपट्टी वसूल झाली आहे.