राज्यात नवीन व्हेरीयंटचे रुग्ण सापडू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये परदेशामधून लोक आली आहेत. त्यांच्या तपासण्या, अहवाल याकडे बारीक लक्ष शासन पूरवत आहे. कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परदेशामधून लोकांचे आगमन झाले असून, त्यातील अनेक जणांची शोध मोहीम सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ७६ च्या आसपास बाहेरगावाहून लोक आली आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६५ लोक परदेशातून दाखल झाले आहेत. यातील ४५ जणांचा शोध लागला आहे. त्यातील २० जणांची तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित २० जणांचा अहवाल ११ तारखेपर्यंत येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोणताही आजार किंवा व्हायरस असला तरी त्यावर योग्य वेळेत उपचार घेणे हीच आवश्यक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे नव्या आलेल्या व्हेरीयंट ओमिक्रोनवर लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नाम. सामंत यांनी केले आहे.
भारतामध्ये कोरोना विषाणूच्या ओमिक्रोन या व्हेरिएंटचे शुक्रवारी २५ रुग्ण आढळले असून या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या करोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत तीन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रोनच्या चार रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये एका तीन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत ११ आणि १२ डिसेंबर या दोन दिवशी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
राज्यातील ओमिक्रोन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमिक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत.