शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ व माहिती जलदगतीने तसेच पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी सरकारने राबवलेल्या अॅग्रीस्टॅक योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील ४३ हजार १८१ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. ही नोंदणी कमी असली तरीही जिल्ह्यात चिपळूण पहिल्या तर गुहागर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. अॅग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगाने नागरी सुविधा केंद्रावर (सीएससी) शेतकरी नोंदणी प्रक्रिया राज्यात २० जानेवारीपासून सुरू केली आहे. या संदर्भात सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभप्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास साहाय्य मिळेल.
पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे घेणे सुलभ होईल. पिकविमा व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण सुलभ होईल. किमान आधारभूत किंमतीवर खरेदीसाठी नोंदणी सुलभ होईल. या योजनेमध्ये आतापर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये चिपळूणमध्ये ६९०४ शेतकरी, गुहागर ६६४०, तीन नंबरवर संगमेश्वर ६४१८ शेतकरी, त्यानंतर खेड ६०८४, राजापूर ४५ हजार ९७५, लांजा ३४७३, दापोली ३३२२, मंडणगड २९५८ तर सर्वात कमी नोंदणी रत्नागिरीत २,८६० शेतकरी यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही योजना आहे. भविष्यातील सर्व सेवा या नोंदणीच्या माध्यमातून सरकार देऊ शकते. यामुळे जास्तीत शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.