रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगांव येथे संभाव्य रिफायनरी प्रकल्पासाठी पर्याय म्हणून पुढे आलेला असताना गावांतील जमीन मालक मोठ्या संख्येने प्रकल्पासाठी जागा देण्यासाठी पुढाकार घेत असल्याने प्रकल्पाच्या उभारणीबाबत हालचालीमध्ये गती निर्माण झाली आहे. काही स्थानिक पुढाऱ्यानी प्रकल्पाला विरोध दर्शवला असल्याची चर्चा समर्थकांमध्ये असताना या प्रकल्पासाठी आठवडाभरापूर्वी रिफायनरीसह एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बारसू सोलगांव भागाची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे.
सदर आरआरपीसीएल आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या दौऱ्यामध्ये प्रकल्प स्थळ तेथील लोकवस्ती आणि पाण्याची उपलब्धता आदी सर्व माहिती जाणून घेण्यात आली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी जागेची व इतर स्रोतांची पाहणी केल्यानंतर प्रकल्प स्थापनेसाठी या जागेला ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते आहे. सध्या संभाव्य रिफायनरी प्रकल्पासाठी नाणार कि बारसू या दोन्ही ठिकाणामध्ये चढाओढ सुरू आहे. त्यातच सिंधुदुर्गचा सुद्धा एक मोठ्या जागेचा पर्यायही चर्चेत आला आहे.
नाणार येथील प्रकल्पाला शिवसेनेने ठाम विरोध दर्शविला असल्याने जवळच्या बारसू, सोलगांव पंचक्रोशीचा प्रामुख्याने विचार सुरू करण्यात आला आहे. ऑगस्ट अखेरीस एमआयडीसह रिफायनरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित बारसू सोलगाव दौरा केला होता. रिफायनरी प्रकल्पाला पूर्वीपासून इतर पक्षांचे समर्थन आहे, भाजप त्याप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी रिफायनरी राज्याच्या हितासाठी गरजेचा असल्याचे जाहीर मत व्यक्त केलेले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनीही प्रकल्प समर्थनाची भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे बारसू सोलगांव भागात वाढत असलेले मोठे समर्थन व बदलत असलेले राजकीय मतपरिवर्तन यामुळे प्रकल्पाच्या आशा जास्त पल्लवित होत आहेत.