रत्नागिरी जिल्ह्यात ३ वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेतील संशयित आरोपींना अखेर एवढ्या दीर्घ कालावधीनंतर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तुळसणी ता. संगमेश्वर येथील राजू मुकादम याची अंगावर गरम पाणी ओतून हत्या केल्याच्या आरोपाखाली संशयित असलेल्या नऊ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबातील विसंगती, संबंधित महिलेने अतिप्रसंगातून वाचण्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी मुकादमच्या अंगावर पाणी ओतले, असा निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने हा निकाल जाहीर केला आहे.
ही घटना २७ मार्च २०१८ ला घडली होती. अनैतिक संबंधाच्या संशयातून राजू मुकादम यांचा खून करण्यात आला, असा आरोप नऊ जणांवर ठेवण्यात आला होता. २७ मार्चला राजू मुकादम आपल्या दुचाकीवरून तुळसणी ते कातकरीवाडी रस्त्याने मुस्लिम मोहल्ला येथे आपल्या घरी जात होता. तो एकता असल्याच्या संधीचा फायदा घेऊन संशयितानी त्याची दुचाकी अडवून त्याच्या तोंडावर रुमाल बांधून संशयितांपैकी एकाच्या घरात घेऊन गेले.
त्यानंतर त्या ठिकाणी राजूचे हातपाय बांधून त्याला लाथा बुक्यानी मारहाण करण्यात आली होती. आणि शेवटी त्यांच्या अंगावर एकदम गरम पाणी ओतून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू ओढावला, अशी तक्रार नोंदविण्यात आली होती. या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यावर, खटल्यात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्षही नोंदवण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षदर्शींच्या जबावातील विसंगती आणि त्यामधील महिलेची जबानी पाहता संशयित सादीक हुसेन कापडी, मकसूद मुकादम, मुआज्जम रज्जाक मुकादम, जलाल बोट, तन्वीर मुकादम, आसरीन मुकादम, फिरदोस कापडी, संदीप पवार, विकास पवार या सर्व नऊ जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.