लांजा कोत्रेवाडी वस्तीलगत लादलेला घनकचरा प्रकल्प रद्द करण्यासाठी दि. १४ ऑगस्टपासून बेमुदत साखळी उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी येथील नागरिकांना माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात हा घनकचरा प्रकल्प संबंधित जागेवरून रद्द व्हावा, यासाठी बच्चू कडू उपस्थित राहून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील कोत्रेवाडी वस्तीलगत घनकचरा प्रकल्प नियोजित आहे. या प्रकल्पासाठीचा प्रस्ताव हा चुकीचा व नियमांची पायमल्ली करून तयार केलेला आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार करून हा प्रकल्प नागरिकांवर लादला जात असल्यांचा कोत्रेवाडी येथील नागरिकांचा आरोप आहे.
तसेच प्रकल्प नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असून लोकवस्ती जवळ असल्याने पाणी दूषित होवून प्रदूषण व रोगराईने जीवन उध्वस्त होणार असल्याचे सांगत कोत्रेवाडीतील नागरिक १४ ऑगस्टपासून लांजा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला बसलेलेआहेत. मात्र आज ४८ दिवस उलटले तरी ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाला प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले असून सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या शेतकरी, मच्छिमार, आंबा बागायतदार व दिव्यांग बांधवांचा मेळाव्यासाठी उपस्थित राहाणार आहेत. येथील यावेळी कोत्रेवाडी घनकचरा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी ते जिल्हाधिकारी यांची भेट घेवून प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षाबद्दल जाब विचारणार असल्याचे आनंद त्रिपाठी यांनी यावेळी बोलताना सांगितले.