रत्नागिरीमध्ये गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी स्टॉल लावून अनेक फेरीवाले दाखल झालेले आहेत. गणेशोत्सवामध्ये फळे, भाजीपाला, डेकोरेशनच्या वस्तू, रांगोळ्या, तोरणे, रुमाल यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अनेक परप्रांतीय या काळामध्ये रत्नागिरी बाजारपेठेत दाखल होतात.
फळं, भाजीपाला यासह विविध आवश्यक साहित्यांच्या विक्रीसाठी अनेक फेरीवाले रत्नागिरी शहरात बेकायदेशीर रित्या स्टॉल लावतात. शहरातील बाजारपेठ परिसरासह काही ठिकाणी बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर स्टॉल धारकांनावर रत्नागिरी पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
पूर्वी नगर पालिकावाले फेरीवाल्यांकडील विक्रीच्या वस्तू जप्त करत असता आणि ठराविक दंड भरल्यावर त्या परत दिल्या जात असत. पण यावेळी पालिकेने वस्तूंची जप्ती करण्याऐवजी त्यांचे वजनकाटेच जप्त करण्याची नवीन युक्ती आजमावली आहे. त्यामुळे हाल, भाज्या या वस्तू त्यांना मोजून देणे शक्य झाले नाही. गेल्या २ दिवसामध्ये पालिकेने बेकायदेशीर ८ ते १० स्टॉल धारकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.
रामआळी, गोखले नाका, हनुमान मंदिर, जेलनाका, विठ्ठल मंदिर परिसरासह धनजीनाका येथे बऱ्याच फेरीवाल्यांची वर्दळ असते. रामआळी परिसरात मात्र हातगाडीवरून फळं विकणारे जागा अडवून उभे राहत असल्याने वाहतूकीची कोंडी निर्माण होते. अगदी पादचाऱ्यांना चालणेही कठीण होऊन जाते.
याबाबत जागरूक नागरिकांकडूनच पालिकेकडे तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेकायदेशीर रित्या स्टॉल लावणाऱ्यांवर पालिकेने कारवाई केली आहे. त्यासाठी पालिकेची जप्तीची गाडी दिवसातून तीनवेळा फिरवण्यास सुरवात केली आहे.