“या भूमीतील तरुणांच्या हाताला काम देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी येथे उद्योगधंदे आले पाहिजेत. साऱ्या जगाचे औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना आपण मात्र जुन्या कल्पना कवटाळून बसलो तर स्पर्धेत आपण कसा टिकाव धरणार? मात्र येथे येणारे उद्योग व्यवसाय हे प्रदुषण न होणारे असावेत एवढाच आमचा आग्रह आहे. सुदैवाने या भूमीतील आमदार आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असल्याने कधी नव्हे तो ‘योग’ आता जुळून आला आहे.. असा ‘योग’ आजवर कधीच जुळून आला नव्हता म्हणूनच आलेली संधी वाया घालवू नये, प्रदुषण विरहीत प्रकल्पांचा मार्ग खुला करावा आणि या भूमीचा विकास देखील झपाट्याने मार्गी लागावा यासाठी वाटद पंचक्रोशीत येणाऱ्या प्रकल्पांचे आम्ही सारेजण जाहीर समर्थन करीत आहोत” असे खणखणीत प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वाटद खंडाळा परिसरातील एक ज्येष्ठ उद्योजक श्री. बाळशेट जोग यांनी केले. श्री. बाळशेठ जोग हे केवळ वाटद, खंडाळा परिसरातीलच नव्हे तर रत्नागिरी तालुक्यातील एक बुजूर्ग व सृजनशील नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सडेतोडपणे सांगितले की वाटद पंचक्रोशीत येऊ घातलेल्या प्रकल्पांना आमचा पूर्ण पाठींबा व सहकार्य राहील.
प्रकल्पाला पूर्ण पाठींबा ! – विकासाचा प्रश्न निघाला की बाळशेठ जोग उत्साहाने पुढे सरसावतात. त्यांनी सांगितले, “सारे जग विलक्षण वेगाने औद्योगिक प्रगती करीत आहे आणि आपण मात्र जुनाट कालबाह्य कल्पना कवटाळून बसलो तर मग स्पर्धेत आपल्या देशाला व आपल्यालाही टिकाव धरणे कदापि शक्य होणार नाही. म्हणूनच या प्रकल्पांचे आपण खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. फक्त हे प्रकल्प प्रदुषणकारी नसावेत एवढीच आमची मागणी होती आणि ती ना. उदय सामंत यांनी त्वरित मान्य केली त्यामुळे या प्रकल्पात नाव ठेवण्याजोगे काहीच नाही. आमचा प्रकल्पाला पूर्ण पाठींबा आहे” असे त्यांनी सडेतोड शब्दात सांगितले.
अर्थव्यवस्था बळकट होईल – त्यांनी पुढे सांगितले, “प्रदुषण न करणारे आणि येथील उद्योग व्यवसायाला पुरक ठरणारे प्रकल्प आले तर साऱ्या कोकणची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. याच भूमिकेतून आम्ही सारेजण वाटद परिसरात होणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मिती व अन्य प्रकल्पांना जाहीर पाठींबा देत आहोत. हे प्रकल्प १०० टोके प्रदुषण नसणारे आहेत. खुद्द उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी तशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पांना आम्ही शनि. दि. २६ जुलै २०२५ रोजी वाटद येथे झालेल्या जन प्रबोधन सभेत व्यासपीठावरुन जाहीर समर्थन दिले” अशा स्वच्छ व स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका विषद केली.
सर्व मागण्या मान्य – श्री. बाळशेठ जोग हे आधुनिक व सुधारणावादी विचारांचे पाईक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढे सांगितले, “आम्ही जाहीर पाठींबा देताना काही अटी घातल्या होत्या, त्या सर्व मान्य असल्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे समर्थन करण्यास कोणतीही हरकत राहिली नाही. प्रकल्पाखाली राहती घरे, सुपिक शेतजमीन, बागायती जमीन, नैसर्गिक जलस्त्रोत (पाणवठे) मंदिर, मस्जिद वा कोणतेही धार्मिक स्थळ नसावे या आमच्या मागण्या ना. उदय सामंत यांनी तात्काळ मान्य केल्या. आमच्या मागण्या मान्य झाल्याने आम्हा सर्वांचे पूर्ण समाधान झाले आहे” असे सडेतोड प्रतिपादन त्यांनी केले.
प्रकल्पांचे स्वागत करुया ! – श्री. बाळशेठ जोग भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, “आज कोकणचा विचार केला तर कोकण भकास होत चालले की काय? अशी भीती वाटू लागली आहे. बहुतांशी तरुण रोजी रोटीसाठी मुंबई वा अन्य बड्या शहरात गेल्याने येथील घरांम ध्ये फक्त वृध्द मंडळी असतात. जवळपास ६० टक्के तर काही ठिकाणी ९० टक्के घरे बंद आहेत. आता तर ही तरुण मंडळी आपल्या सोबत कुटुंब घेऊन गेल्याने येथील लोकसंख्या रोडावल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे परिसराची ‘बरकत’ आटली की काय? असे वाटू लागते.. हे बदलायचे असेल तर येथे उद्योग आलेच पाहिजेत.. याच भावनेने येणाऱ्या प्रदुषण विरहित प्रकल्पांचे आपण सर्वांनी सुहास्य वदनाने स्वागत करायचे आहे” असे निःसंदीग्ध प्रतिपादन त्यांनी केले.
सर्वाधिक दर मिळणार ! – श्री. बाळशेठ जोग यांनी पुढे सांगितले, “येथील जमिनींना भरघोस मोबदला मिळावा अशी सर्वांची मनोभावना आहे. उद्योगमंत्री हे सुदैवाने आपले आहेत, या मतदार संघाचे आम दार आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ सांगितले की जमिनींना सर्वाधिक दर दिला जाईल. लवकरच दर जाहीर होईल आणि मग मी खात्री देतो की सारे ग्रामस्थ मनोमन सुखावतील. अशा स्थितीत या प्रकल्पाला विरोध कशांसाठी करायचा? असे उत्तम इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प येत असताना त्यांचे आपण सर्वांनी स्वागत करु या आणि ही भूमी सुजलाम, सुफलाम झाल्याचे पाहण्याचे भाग्य आपणा सर्वांना याच पिढीला मिळो अशीच आम्हा सर्वांची सदभावना आहे” अशी मनोभावना त्यांनी व्यक्त केली.