जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २ हजार ४१५ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली; मात्र जिल्ह्यात चार्जिंग सेंटरची वानवा आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. २०२२ या वर्षपिक्षा २०२३ मध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीमध्ये जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इंधनाची वारंवार होणारी दरवाढ वाहनधारकांना न परवडणारी झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांची पावले सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वळली आहेत.
सीएनजीबरोबर आता इलेक्ट्रिक वाहनांवरील खर्च कमी असल्याने इलेक्ट्रिक वाहन खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे शिवाय सरकारकडूनसुद्धा या वाहनांवर प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत २ हजार ४१५ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक गाड्यांसाठी जिल्ह्यात एकमेव चार्जिंग सेंटर रत्नागिरी येथे आहे. अद्याप दुसरे उभारण्यात आलेले नाही. एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत असताना दुसरीकडे चार्जिंग पॉइंट नसल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.