रत्नागिरी तालुका पारंपरिक मच्छीमार हक्क संघटनेतर्फे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सांमत यांना निवेदन देण्यात आले. शासनाने २०२१ मध्ये लागू केलेल्या मच्छीमारांच्या नवीन सुधारीत कायद्याची अंमलबजावणी करावी असे निवेदनात नमुद केले आहे. बेकायदेशीरपणे आणि एलईडी लाईटने मच्छीमारी सुरु आहे, त्याकडे मत्स्य विभागाने दुर्लक्ष करु नये अशी मागणी त्या निवेदनात केली आहे.
सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार्या पर्ससिननेट मच्छीमारांच्या समस्यांसंदर्भात बोलताना मंत्री म्हणाले की, कोकण किनारपट्टीवर एलईडीचा वापर करुन मासेमारी करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी हा कायदा आणला आहे. पर्ससिन नेटद्वारे बारा नॉटीकल मैलच्या बाहेर मासेमारी करण्या संदर्भात मच्छीमारांचा संभ्रम झाला आहे. तो प्रश्न सोडविण्यात येईल. मात्र पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
यामध्ये बारा नॉटीकल मैलच्या बाहेर जाऊन मासेमारी करण्यासंदर्भात पर्ससिननेट मच्छीमारांच्या मनामध्ये अनेक शंकाकुशंका आहेत. त्यावर काही दिवसांपुर्वी बैठक झाली होती. त्यामध्ये पर्ससिननेट मच्छीमारांचे समाधान झाले नाही असे मत मांडले होते. त्यांच्या अडीअडचणी चर्चा करुन सोडविण्यात येतील. तसेच परराज्यातील मोठे ट्रॉलर्स कोकण किनारपट्टीवर येऊ नयेत यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. सुधारीत कायदा झाल्यानंतर बेकायदेशीर नौकांवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढल्या आहे.
यामध्ये सर्वाधिक परराज्यातील नौका आहेत. यावरुन परराज्यातून येणार्या नौकांद्वारे मोठ्याप्रमाणात मासेमारी केली जाते हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पर्ससिनच्या वाट्याला मासळी शिल्लकच राहत नाही. त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात येत आहेत. मात्र हे करत असताना पारंपरिक मच्छीमारांची गैरसोय होणार नाही याची देखील दित्कीच काळजी घेण्यात येणार आहे.