मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सोमवारी सकाळी एकाच दिवशी दोन गॅस टँकर वेगवेगळ्या ठिकाणी पलटी झाले. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा हातखंबा येथे शाळेजवळ गॅसने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातात दोन टपऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यात एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसऱ्या अपघातात निवळी-जयगड मार्गावर एक गॅस टँकर रस्त्याकडेला पलटी झाला होता. दरम्यान हातखंब्यामध्ये झालेल्या अपघातानंतर तेथील संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. एकामागोमाग एक गॅस टँकर पलटी होत असून सततच्या अपघातांना कंटाळून हातखंबावासियांनी सोमवारी झालेल्या अपघातानंतर रास्तारोको केला होता. गेल्या ८ दिवसांत हातखंब्यामध्ये गॅसवाहू टैंकरला झालेला हा दुसरा अपघात आहे. त्यामुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते. आमच्या जीवावर गॅस वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीम ळे अख्खा गाव एक दिवस भस्मसात होईल, अशा संतप्त भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी काही काळ मुंबई-गोवा महामार्ग हातखंबा गावात रोखून धरला होता.
दोन अपघात – सोमवारी सकाळी सुमारे ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास हातखंबा आणि निवळी परिसरात दोन वेगवेगळे गॅस टैंकर पलटी झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हातखंबा येथे शाळेजवळ टँकर पलटी झाल्याने जवळील दोन वडापावच्या टपऱ्यांना धक्का बसला, ज्यात एक महिला जखमी झाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
गंभीर प्रश्न – या घटनेमुळे रत्नागिरीतील वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जयगडमधून कोल्हापूरकडे जाणारे गॅस टँकर दिवसाढवळ्या शहरातील मुख्य रस्त्यांवरून धावतात. या टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असून, अपघात झाल्यास मोठ्या जीवितहानीचा धोका निर्माण होतो.
भीतीचे वातावरण – वस्ती आणि शाळेजवळ अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर वेळेवर उपाययोजना केली नाही, तर भविष्यात एखादा मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाकडे मागणी – या अपघातांची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी आणि अशा टँकरच्या वाहतुकीसाठी वेगळी मारिषा आखावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
एकाचवेळी दोन अपघात – पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जयगड मार्गावरील निवळी येथील कोल्हापूरच्या दिशेने निघालेला गॅस टँकर सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निवळी फाट्याजवळच्या एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता. हा टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही. मात्र परिसरात भीतीचे वातावरण निम णि झाले होते.
अपघात रोखणार कसे? – गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर गॅसवाहू टँकरचे अपघात होत असून हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन आता कोणती भूमिका घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलीस अधिक्षकांच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते की, यापुढे गॅस टँकरची वाहतूक करणाऱ्या चालकाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच गॅस वाहतूक करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच टँकरमध्ये गॅस भरल्यानंतर टँकरची तपासणीदेखील करण्यात येईल. मात्र पोलीस अधिक्षकांनी सांगितलेल्या सूचनेला दोन दिवस होत नाहीत, तोवर एकाच दिवशी दोन अपघात झाल्याने हे अपघात रोखणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.