रत्नागिरी न.परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे गटनेते राजन शेट्ये यांनी सभागृहात एक अत्यावश्यक पण कदाचित दुर्लक्षित झालेली बाब उघडकीस आणली आहे. शहरातील साळवी स्टॉप येथील खोक्यांचा विषय त्यांनी सभेत उपस्थित केला आहे. साळवी स्टॉप ते नाचणे या अंतर्गत रोडवर पालिकेच्या मालकीचे जवळपास १५ खोके आहेत.
मारुती मंदिर स्टेडियम येथील नगर परिषदेने मुदत संपलेल्या गाळ्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, आता साळवी स्टॉप येथील मुदत संपलेले पालिकेच्या मालकीचे दुकान खोके पालिकेने अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत. पालिकेची परवानगी न घेताच त्यांची दुरूस्ती देखील करण्यात आली असून. अनेक खोक्यांमध्ये पीओपी केले गेले आहे तर काही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे.
त्यापेक्षा कळस म्हणजे, मूळ भाडेकरूकडून हे खोके तिसर्याच व्यक्तीला जादा भाडे आकारून देण्यात आले आहेत. पालिकेला मिळणारे भाडे अवघे ४ हजार, तर मुळ भाडेकरूंना भाडे मिळते १० ते १५ हजार, अशी मिळकत मूळ भाडेकरू मिळवत आहेत.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप-नाचणे मार्गावरील फुटपाथवरचे गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही रनपकडून सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. माळनाका येथील रनपच्या व्यायामशाळेच्या आवारात असलेल्या ट्रॅव्हल्स ऑफिसवरही अशीच कारवाई करण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. सोमवारी झालेल्या विशेष सभेत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेंतर्गत जागा उपलब्ध करून देण्याचा ठरावही मंजूर झाला आहे. या ठरावानुसार रनपच्या मालकीचा एक गाळा उपलब्ध करून दिला जाणार आहे.