उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ३ ठिकाणी दिवसरात्र फिरत्या वायूवेग ६ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. गणेशभक्तांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्याने कारवाईची वेळ आली नाही; मात्र, अवजड वाहतूक बंदी असूनही तिचे उल्लंघन केलेल्या १४ वाहनांवर कारवाई करून ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गणेशोत्सवासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त कोकण व गोवा या भागात येतात. त्यामुळे या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढते. या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वाशी (नवी मुंबई) ते कुडाळ (सिंधुदुर्ग) या मार्गावर वायूवेग पथके नियुक्त करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आणि साहाय्यक प्रादेशिक अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कशेडी ते चिपळूण, चिपळूण ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते राजापूर अशी तीन ठिकाणी सकाळी सहा ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री दहा आणि रात्री दहा ते सकाळी सहा अशा तीन सत्रामध्ये ही सहा पथके तैनात होती. गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर वाहनांना अडथळा किंवा कुठलीही अडचण आल्यास, अपघात झाल्यास तत्काळ दूर केली जात होती. या कालावधीत भक्तांनी वाहतूक नियमांचे पालन केल्याने वायूवेग पथकाला कारवाई करण्याची वेळ आली नाही; मात्र या कालावधीत महामार्गावर. बंदी असूनही तिचे उल्लंघन केलेल्या १४ अवजड वाहनांवर वायूवेग पथकाने कारवाई केली.
महामार्गावर विविध पथके – यंदा गणेशभक्तांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यामुळे अडचणी आल्या नाहीत; मात्र अवजड बंदी असूनही वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी वायूवेग पथके कार्यरत होती, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले.

