कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वच गाड्यांना तुफान गर्दी असल्या कारणाने तिकीटसुद्धा बरीच वेटिंग वर दिसत आहेत. तरी सुद्धा अनेक चाकरमानी मुंबई पुणे येथे परतू लागल्याने गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही वेळा दरवाज्यात उभा राहून देखील संपूर्ण प्रवास करावा लागतो एवढी परिस्थिती निर्माण होते. पण एवढा लांबचा प्रवास दरवाज्यात राहून करणे सोप्पी गोष्ट नाही आहे. डोळ्यावर अनावर झालेली झोप त्यामुळे काही वेळा अपघाताच्या घटना घडतात.
कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या रोहा येथील युवकाचा मंगळवारी दि. ७ रोजी पहाटेच्या सुमारास खेड तालुक्यातील वेरळ खडकवाडी येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाला. सकाळी ९.४५ ते १० वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक शेजारी छिन्न विच्छिन्न अवस्थेमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मोरे वसाहतीत राहणार विनोद तय्याप्पा क्षीरसागर वय २७ या तरुणाचे वडील मुंबई येथे उपचारार्थ दवाखान्यात दाखल असून हा तरुण मुंबईतून रोहा असा रेल्वेतून प्रवास करत असावा. मात्र, झोप लागल्याने तो रेल्वेतून कोकण रेल्वे मार्गावर पुढे आला, असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खेड तालुक्यातील वेरळ गावानजीक रेल्वेतून एक प्रवासी रेल्वेतून पडल्याचे समजताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, अभिषेक डेरवणकर, पोलीस पाटील संजय शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. प्रसाद गांधी यांच्या रुग्णवाहिकेने मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे त्याची ओळख पटवण्यात आली. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेण्यात आला आहे.