शहराच्या सुधारित नळपाणी योजनेचा ठेका मिळवण्यासाठी ठेकेदार अन्वी कन्स्ट्रक्शन यांनी हा ठेका मिळविताना शासनाची दिशाभूल केली. क्षमता नसतानाही कंपनी प्रथम श्रेणीत असल्याचे दाखवून शासनाची आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. ठेकेदार, त्यांना सहकार्य करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी, विद्यमान मुख्याधिकाऱ्यासह ११ जणांविरुद्ध सोलापूर येथील महेश ज्ञानदेव थिटे यांनी रत्नागिरी न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कीर म्हणाले, महेश ज्ञानदेव थिटे यांनी याबाबत २० फेब्रुवारी २०२३ ला रत्नागिरी न्यायालयात तक्रार दिली आहे.
या तक्रारीमध्ये त्यांनी ठेकेदार अर्जुन संताराम पाटील, अतुल पाटील तसेच तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद माळी, सध्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर, पाणी अभियंता अविनाश भोईर, अविनाश पांडकर, बी. के. वानखेडे, एस जी सादिगले, सुनील एम. शिंदे, एन. व्ही. भोई, एस. पी. सोहनी या ११ जणांना प्रतिवादी बनवले आहे. कोर्टात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये थिटे यांनी म्हटले आहे की, ठेकेदार प्रथम क्लास ४ मध्ये होता मात्र ठेका घेण्याआगोदर ३१ दिवसांपूर्वीच त्याने १ चे रजिस्ट्रेशन केले आहे. नळपाणी योजनेची निविदा मिळवण्यासाठी वर्कडन सर्टीफिकेटसाठी सर्वच अधिकाऱ्यांनी देखील साह्य केले आहे.
याबाबतची तक्रार रत्नागिरी जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे करून देखील त्यांनी दखल घेतली नाही, असा आरोप थिटे यांनी आपल्या फिर्यादीत केल्याचे कीर यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नळपाणी योजनेत घोटाळा केल्याचा आरोप देखील तक्रारीत केल्याचे कीर यानी सांगितले. याबाबत अॅड. अविनाश शेट्ये यांना विचारले असता, त्यांनी तक्रार दाखल केल्याचे सांगितले.