भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या वर्षाकरिता छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदार यादीच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन पडताळणी मोहीम २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. या कालावधीत बीएलओ मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधीत कुटुंबप्रमुखांकडून करणार आहेत. मतदारयादीत नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार १ जानेवारी २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकावर १८ वर्षे पूर्ण करणारे तसेच १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर २०२४ या अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदारे, दुबार नोंदी मृत मतदार कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीमध्ये दुरुस्ती आदी मुद्द्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
२२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या कालावधीत मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण व मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होणार असून, त्यावरील दावे व हरकती १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारल्या जातील. अंतिम मतदारयादी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द होणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी नमुना अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर दावे व हरकतींबाबत मतदार नोंदणीचे ऑफलाइन अर्ज संबंधित तहसील कार्यालयात (निवडणूक शाखा) अथवा बीएलओमार्फत सादर करावेत किंवा ऑनलाइन अर्ज Voter Service Portal. Voter Portal या संकेतस्थळावर व Voter Helpline या Mobile App वर सादर करता येतील.
या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण, आल्यास त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा त्यांचे तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. बीएलओंची यादी प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. जिल्ह्याची मतदारयादी अचूक अचूक व सुदृढ होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.