गणेशोत्सवामध्ये अनेक प्रकारचे देखावे, चलचित्र, ताज्या घडामोडींवर आधारित नवीन काही ना काहीतरी डेकोरेशन बनवलेले पाहायला मिळतात. तर काही ठिकाणी पूर्वजांच्या रूढी परंपरा अजूनही जिवंत ठेवल्या गेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे साखरप्यातील अश्वारूढ गणपतीची परंपरा.
गणेशोत्सव काळात ठिकठिकाणी अनेक परंपरा श्रद्धेने पाळल्या जातात. अशा पैकीच एक म्हणजे कोंडगांव-साखरपा परिसरातील अश्वारूढ गणेशाची दीड शतकाची परंपरा आजही जोपासली जात आहे. या गावांमध्ये अनेक घरांमध्ये दरवर्षीप्रमाणे अश्वारूढ गणेश मानाने विराजमान झाले आहेत.
गणपतीचे वाहन हे उंदीर, पण साखरपा कोंडगाव परिसरातील सरदेशपांडे, अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे, नवाथे, जोगळेकर, गद्रे, पोंक्षे, शिंदे या घराण्यांच्या घरी घोड्यावर विराजमान झालेल्या गणेशमूर्ती पहावयास मिळतात. त्या मागे दीड शतकांचा इतिहास आहे. ही घराणी मराठेशाहीच्या काळात विशाळगडावर अधिकारी होती. सरदेशपांडे घराण्याकडे हे विशाळगड सुभ्यातील गावांच्या महसूल वसुलीचे अधिकार होते तर अभ्यंकर हे पागा सांभाळत असत. केळकर हे दिवाण होते तर केतकर कुटुंबाकडे सुभेदारी होती. रेमणे हे ग्रामोपाध्ये होते. या घराण्यांना साखरपा आणि परिसरातील गावांमध्ये जमिनी इनाम मिळाल्या होत्या. मराठेशाहीचा अस्त झाला.
इंग्रजांचे साम्राज्य वाढीस लागल्यावर या कुटुंबाचे अधिकार लोप पावत गेले आणि चरितार्थासाठी ही कुटुंबे गडउतार झाली. गडावरुन येताना ते घोड्यावरुन आले म्हणून त्यांचे गणपती घोड्यांवरून आणण्याची प्रथा सुरू झाली. सुरूवातीला या घराण्यांकडे लाकडी अश्व होते. सरदेशपांडे, केळकर, पोंक्षे यांच्याकडे हे लाकडी अश्व आहेत. त्यांच्या गणेशमूर्ती त्याच अश्वावर काढल्या जातात. रेमणे, नवाथे, अभ्यंकर, जोगळेकर यांचे अश्व आजही सुस्थितीत आहेत. पण आता त्यावर गणपती काढणे, अश्वारूड गणेश मुर्तीकारांकडुन आणणे, विसर्जन करणे हे कठीण होत चालल्याने त्यांनी मातीच्या सहवासह मूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे.