कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं ४ ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला.
राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “मला माझे शाळेतले दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस कायमच उत्साहवर्धक असायचा. पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस कायमच अविस्मरणीय असायचा.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, टास्क फोर्स सदस्य डॉ. सुहास प्रभू, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे विकास गरड, अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक राहुल त्रिवेदी प्रत्यक्ष आणि काही ऑनलाईन उपस्थीत होते.