राज्यामध्ये पहिली ते सातवीच्या शाळा नियमित सुरु कधी होणार यावरून बऱ्याच उलथापालथी झाल्या असून, अद्याप त्यावर काही ठोस निर्णय होत नव्हता. परंतु, काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. राज्य शासनाने शाळा सुरु करण्याबाबत इतर सर्व गोष्टींची पूर्तता केल्यास, पहिली ते सातवी पर्यंतची शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नसल्याचं चाईल्ड टास्क फोर्सचं म्हणणं आहे.
लहान मुलांसाठी सध्या लस उपलब्ध नसली तरी, जेव्हा लस उपलब्ध करून दिली जाईल, तेव्हा लहान मुलांचं लसीकरण सुरु होईल. मात्र त्यापूर्वी शाळा सुरु करण्यास काहीही हरकत नसल्याचं टास्क फोर्स मधील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
चाइल्ड टास्क फोर्सनं जरी हिरवा कंदील दिला तरी कॅबिनेट बैठकीत सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत चर्चा केली जाणार आणि त्यानंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पुढील दहा दिवसांमध्ये सर्वांशी चर्चा करून सल्ला मसलत करून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभाग निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यामध्ये कोरोनाची स्थिती आता आटोक्यात येत असल्याचं निदर्शनात आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यावर मुंबई महापालिका प्रशासन आता मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत अनुकूल आहे. पण लहान मुलांच्या लसिकरणानंतरच शाळा सुरु कराव्यात असा कोविड टास्क फोर्सचा आग्रह होता. शहरी भागांमध्ये टप्प्याटप्प्यानं शाळा सुरु करायच्या किंवा पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करायच्या याबाबत शिक्षण विभागानं आपली तयारी बघून आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता बघून निर्णय घ्यावा, असंही टास्क फोर्सनं म्हटल आहे.
राज्यात आता लहान मुलांच्या वयोगटासाठी लसीकरणाची सुरुवात करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेनेही तीन लाख मुलांच्या लसीकरणाची तयारी केली असून राज्य सरकार आणि कोविड टास्क फोर्सची सूचना येताच या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे माहितीमध्ये समजले आहे.