रत्नागिरी जिल्हात आज अनेक गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात साधारणत सव्वा लाख पेक्षा जास्त गौरी आणि बाप्पांना आज विसर्जित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात सज्ज झाली आहे.
विसर्जन स्थळांवर पोलिसांनी जादाची कुमक लावून कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, विसर्जनाची विशेष नियमावली देखील ठरवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणेशचतुर्थीला साधारणपणे दीड लाखाहून अधिक गणेशमूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वाजत गाजत घरी आलेल्या सुमारे दहा हजार गणरायांचे विसर्जन दीड दिवसांनी करण्यात आले. त्यानंतर घरोघरी गौरीचे आगमन झाले असून, गौरी -गणपतीचा सणदेखील उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षी बाप्पाचा मुक्काम सर्वांच्या घरी केवळ पाच दिवसांसाठीच होता.
जिल्ह्यात पाच दिवसांचे गौरी गणपतीसाठी तब्बल सव्वा लाखच्या दरम्यान घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या या काळामध्ये सर्व भाविकांनी गणपतीची मनोभावे प्रतिष्ठापना केली. जिल्ह्यात मंगळवारी गौरी विसर्जनाबरोबरच गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
गौरी गणपती विसर्जनासाठी शहरी भागात मांडवी किनाऱ्यासह, भाट्ये, पांढरा समुद्र, तर ग्रामीण भागात काळबादेवी, मिऱ्याबंदर, साखरतर, आरेवारे किनाऱ्यावर बऱ्याच प्रमाणात गणपतीचे विसर्जन केले जाते. गणपती विसर्जनासाठी शहरातील मांडवी समुद्र किनारी भरपूर गर्दी होते. शहरासह साळवी स्टॉप, मारूती मंदीर, माळनाका, परटवणे आदी लगतच्या भागातील गणेशभक्तही विसर्जनासाठी मांडवी समुद्रकिनारी हजेरी लावतात. त्यामुळे मांडवी किनाऱ्यासह गर्दी होणाऱ्या सर्व समुद्रकिनारी पोलीसानी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. आज जिल्ह्यातील सुमारे १४ सार्वजनिक आणि सव्वा लाखहून अधिक गणरायांना निरोप देण्यात येईल. यापैकी रत्नागिरी शहरामधील ५ हजार ५३१ घरगुती गणेशेमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे.