आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त लावण्यासाठी २० टक्के कामगार कपातीचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गेली १८ ते २० वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या विविध विभागांतील ५५ कामगारांना कमी केले. पालिकेच्या या निर्णयामुळे या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अचानक हे कामगार रस्त्यावर आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, अनेकांना रडू अनावर झाले. रत्नागिरी पालिकेने आज अचानक आरोग्य, बांधकाम, पाणी, उद्यान आदी विभागांतील २० टक्के कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अनेक कामगारांना धक्का बसला आहे. एकूण ५५ कामगार एकाच दिवशी पालिकेने कामावरून कमी केले. यामध्ये सर्वांत जास्त आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या विभागातील ६ घंटागाड्या बंद केल्या. चालक आणि दोन कर्मचारी असे कामगार कमी केले. त्यामुळे घंटागाड्यांचे मार्ग कमी केल्याने आज कचरा उचलण्यासाठी गाड्या उशिरा आल्या.
कचरा उचलण्यासाठी विविध विभागांत काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसताना आज अचानक ५५ कामगार कमी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही वर्षांपासून पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी त्याचा मोठा फटका या कर्मचाऱ्यांना बसला आहे. शहराचा विस्तार होत आहे. वाढते शहरीकरण आणि लोकसंख्येमुळे मनुष्यबळ मुळातच कमी आहे. त्यात हे ५५ कामगार कमी केल्यामुळे पालिकेच्या कामाची संपूर्ण घडी विस्कटली आहे. आगामी गणपती, दसरा, दिवाळी हे महत्त्वाचे सण येत असतानाही आज अचानक ५५ कामगार कमी झाल्यामुळे या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हो अधिकृत माहिती दिली.
विविध विभागांची घडी विस्कटली – रत्नागिरी पालिकेकडे सध्या ३०० कामगार कार्यरत आहेत. पैकी ५५ कामगार अचानक आज कमी केल्यामुळे पालिकेचे २५० विविध विभागांतील कामगार झाले आहेत. शहराची लोकसंख्या जवळजवळ दीड लाखाच्यावर गेली आहे. कर्मचारी कपातीमुळे विविध विभागांतील कामाची घडी विस्कटली आहे.