कोदवली धरणात ६ लाख १७ हजार क्युबिक मीटर गाळ

84

कोदवली येथे ब्रिटीशांच्या काळात बांधकाम झालेल्या आणि गेल्या १४५ वर्षापासून राजापूकर शहरवासीयांची तहान भागवित असलेल्या साहेबाच्या धरणामध्ये सद्या सुमारे सहा लाख १७ हजार क्युबिक मीटर गाळाचा संचय झालेला आहे. नाम फाऊंडेशनच्या सहाय्याने उपलबध झालेल्या मशीनरीच्या सहाय्याने या गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले आहे. या गाळ उपशामुळे धरणामध्ये भविष्यामध्ये अधिक पाणीसाठा होणार असून हा पाणीसाठा मे-जून महिन्यांतील पाणीटंचाई दूर होण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकणार आहे. भारती कोदवली येथे ब्रिटीशांच्या काळामध्ये सन १८७८ मध्ये साहेबाचे धरण बांधण्यात आले असून गेल्या १४५ वर्षापासून राजापूरकरांची पाण्याची तहान हे धरण भागवित आहे. नैसर्गिक दाबाने या धरणातून पाच कि.मि. अंतरावर वसलेल्या राजापूर शहराच्या जलसंचय टाकीमध्ये पाणी येते. त्यासाठी नगर परिषदेला कोणताही खर्च करावा लागत नाही. अशा फायदेशीर असलेल्या या धरणाच्या सुमारे दिड मीटर परिसरामध्ये सुमारे – सहा लाख १७ हजार क्युबिक मीटर गाळ संचय झालेला आहे. शिवाय जुन्या धरणाला गळतीही. लागलेली आहे. त्याचा फटका शहरातील पाणीपुरवठ्याला होऊ लागल्याने त्याठिकाणी नवीन धरण बांधण्यात येत आहे. त्याचवेळी धरणातील गाळाचा उपसा व्हावा अशीही मागणी होऊ लागली आहे.

धरणातील गाळ उपशासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने गाळ उपसा झालेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून नाम फाऊंडेशन, महसूल आणि नगर परिषद यांच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचे काम सुरू आहे. हे बहुतांश काम पूर्ण झाले असून आता साहेबाच्या धरणातील गाळाचा उपसा करण्याचे काम सुरू झाले आहे. धरणातील गाळ उपशामध्ये नाम फाऊंडेशन, महसूल आणि नगर परिषद यांचे सहकार्य आणि लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे. गेल्या सात दिवसांपासून नाम फाऊंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने धरणातील गाळ उपशाचे काम सुरू झाले आहे. या गाळ उपशानंतर होणारा मोठ्या प्रमाणातील धरणातील पाणीसाठा भाविष्यातील टंचाईच्या काळात शहराच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असा कयास आहे.