भाद्रपद महिन्यात शुक्ल सष्टमीला अनुराधा नक्षरात ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीचं आगमन होत असतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु प्रत्येक प्रांतानुसार हा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत.
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटले जाते. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन करतात.
यंदा ३ सप्टेंबर शनिवारी गौराईचं आवाहन तर ४सप्टेंबर गौरी पूजन केले जाणार आहे. तर ५ सप्टेंबरला गौरी विसर्जन होणार आहे. पंचांगानुसार ज्येष्ठागौरी पूजन तिथी आणि मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत. ज्येष्ठा गौरी आवाहन 3 सप्टेंबर, शनिवार आहे. त्याची वेळ रात्री १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. ज्येष्ठा गौरी पूजन ४ सप्टेंबर, रविवारी असून अनेक ठिकाणी गौरीचा तिखटा सण देखील साजरा केला जातो. ज्येष्ठा गौरी विसर्जन ५ सप्टेंबर, सोमवार असून वेळ रात्री ०८.०५ पर्यंत आहे.
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात.
या उत्सवाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करतात. रांगोळीने लक्ष्मीची पाऊले काढून शुभ मुहूर्तावर थाटामाटात गौरीला घरात आणतात. आणि आसनावर विराजित करतात. ज्येष्ठा गौरींसाठी सुंदर मखर सजवले जाते आणि गौरींना वेगवेगळी फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केलं जातं. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.