रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वरचेवर ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडत आहेत. अनेकदा जनजागृती करून देखील अशा घटना काही दिवसांच्या फरकाने घडू लागल्या आहेत. अनेक वेळा बनावट फोन करून, ओटीपी ची मागणी करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. तरी प्रत्येक वेळी बँक कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी कायम अशा प्रलोभनांना भुलू नका, सतर्क राहा असे कायम आवाहन करत असतात.
रत्नागिरी मध्यवर्ती भागातील एका महिलेची क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने ३१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली गेली. ही घटना ३ जून २०२२ रोजी दुपारी २.३० वा. कोकणनगर येथे घडली होती. शर्मा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्राजक्ता दिलीप राठोड वय ३५, रा.कोकणनगर, रत्नागिरी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, ३ जून २०२२ रोजी दुपारी प्राजक्ता राठोड यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. बोलणाऱ्याने आपले नाव शर्मा सांगून राठोड यांना तुमचे क्रेडिट कार्ड क्लोज करतो असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन राठोड यांनी आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर शर्माला दिला. काही वेळाने राठोड यांच्या बँक खात्यातून ३० हजार ९०० रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून त्यांची फसवणूक करण्यात आली.
पैसे काढल्याचा मेसेज आल्यावर राठोड यांना आपली काहीतरी फसवणूक झाली असल्याचा अंदाज आला. परंतु, त्यांनी तेंव्हा पोलीसांची मदत का घेतली नाही ? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर, अधिकचा तपास शहर पोलीस करत आहेत.