रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील स्मितेश जोशी उद्यमनगर येथे राहत होता. मुंबई येथे नोकरीसाठी असणारा स्मितेश दिवाळी सणासाठी दोन दिवसांपूर्वी गावी काळबादेवी येथे आला होता. इंजिनियर असलेला स्मितेश मुंबईतून परदेशात नोकरीसाठी जाणार होता. परंतु काळाने त्याच्यावर घाला घातला. स्मितेशच्या मृत्यूचे वृत्त कळताच काळबादेवी परिसरात शोककळा पसरली आहे. स्मितेश आपला मित्र प्रसाद सुधीर राऊळ वय-२५ याच्यासोबत पावस येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. यावेळी बासीन रहीम भट्टीवाले वय-२४ हा रत्नागिरीतून गावखडी येथील आपल्या गावी जात होता.
रात्री साडेआठच्या दरम्यान फिनोलेक्स कंपनी फाटा येथे एका तिसऱ्या दुचाकी स्वाराने हूल दिल्यानंतर स्मितेश जोशी आणि बासीन भट्टीवाले या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्मितेश दिलीप जोशी याचा जागीच मृत्यू ओढावला. तर बासीन भट्टीवाले व प्रसाद राऊळ हे दोघे देखील गंभीर जखमी झाले आहेत. तिघांनाही तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तपासणी केल्यानंतर स्मितेश दिलीप जोशी याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
ऐन दिवाळीत रत्नागिरीमध्ये मोटरसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात, रत्नागिरी पावस मार्गावर फिनोलेक्स फाटा येथे दोन दुचाकींच्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील स्मितेश दिलीप जोशी वय-२८ याचा मृत्यू झाला आहे. इंजिनिअर असलेला हा तरुण परदेशात नोकरीसाठी जाणार होता पण, या दुर्देवी अपघातामुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.
अपघाताचे वृत्त कळताच, नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तर या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पूर्णगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.