पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. शिंदे-फडणवीस सरकारकडे जवळपास १७० आमदार आहेत. विविध पक्षाचे आणखी बारा ते तेरा आमदार संपर्कात आहेत. लवकरच आमची संख्या १८२ वर जाऊ शकते. त्यामुळे निवडणुका वेळेतच होतील. स्वतःचे आमदार टिकून राहावेत यासाठीच विरोधकांकडून वक्तव्य केली जात आहेत.
शिंदे गटामध्येच फुटणारा एक शिंदे असेल या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मंत्री सामंत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आलेले सगळे पन्नास आमदार ज्येष्ठ आहेत. प्रत्येक जणं चार-चार वेळा निवडून आलेला आहे. त्यामुळे कोणती गोष्ट कळण्यासाठी आम्हाला बालवाडीत किंवा शाळेत जावे लागत नाही. विरोधकांकडून कोणतीही वक्तव्य केली तरीही कोणीही विचलित होणार नाही.
शिवसेनेचे फाउंडर म्हणून आळखले जाणारे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे विरोधकांना जो धक्का बसला आहे, त्यातून कार्यकर्ते सावरावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गजानन कीर्तिकर इकडे आले आणि अमोल कीर्तिकर तिकडे राहिले हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही.
मात्र गजानन कीर्तिकरांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपल्या सोबतच्या लोकांना स्थिर ठेवण्यासाठी पत्रकार परिषद घ्याव्या लागतात. दरम्यान, दीपाली सय्यद यांच्याविषयी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, सय्यद या स्वतःहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्या होत्या. त्यांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील.