चांगल्या कार्याची कायमच वाहवा होत असते. केलेल्या चांगल्या कृत्याचे उत्साहाने स्वागत केले तर, करणाऱ्या व्यक्तीला देखील त्यामुळे पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळते. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ-आंबेत नादुरुस्त पुलाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय उत्तम काम करणारे मंडणगडचे तहसीलदार विजय सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांचा मंडणगड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यामध्ये असे अनेक शासकीय अधिकारी आहेत ज्यांचे नाव त्यांच्या निवृत्ती नंतर देखील तेवढ्याच मानाने घेतले जाते. तो आदरपूर्वक दरारा अजूनही त्या त्या विभागामध्ये टिकून राहिलेला असतो. उद्योजक दीपक घोसाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमास शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, उपाध्यक्ष नीलेश गोवळे, श्रीपाद कोकाटे, सेक्रटरी कौस्तुभ जोशी, विनोद जाधव, , प्रवीण जाधव, राजेश पारेख, निवासी नायब तहसीलदार भिसे, सर्कल खामकर यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना तहसीलदार सूर्यवंशी म्हणाले, सुसंवादाच्या कार्यक्रमामुळे जनतेचे प्रश्न जाणून घेण्याची आणि त्यावर कायदेशीर मार्गाने उपाययोजना करण्याची संधी मिळाते. व्यापाऱ्यांनी संघटित होऊन केलेले प्रयत्न आगामी काळात तालुक्याच्या विकासास पोषक ठरणारे आहेत. निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी प्रशासकीय अधिकारी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असल्याचे सांगितले. तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नाकरिता तहसील कार्यालय तत्परतेने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर यांनी तहसील कार्यालय व पत्रकारांचे आभार मानले. संघटनेचे सचिव कौस्तुभ जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, जिल्हा प्रतिनिधी दीपक घोसाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश पारेख यांनी आभार मानले.