मत्स्य बंदर म्हणून विकसित होत असलेल्या मिरकरवाडा बंदराच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनेकांनी कच्ची आणि पक्की बांधकामे केली आहेत. बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या ३५० जणांना नोटीस पाठवली असून स्वतःहून हे बांधकाम हटवण्यास सांगितले आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक तथा अभिनिर्णय अधिकारी रत्नाकर राजम यांनी याला दुजोरा दिला आहे. मिरकरवाडा बंदर हे मत्स्य बंदर म्हणून विकसित होणार आहे. पहिल्या टप्प्यात ब्रेकवॉटर वॉलसह गाळ काढण्याचे काम केले. यातच निधी संपल्याने अपेक्षित असलेली कामे झाले नाहीत. ठेकेदाराने वाढीव निधीसाठी मागणी केली आहे; परंतु अद्याप निधी मंजूर झालेला नाही. सागरमाला योजनेतून दुसऱ्या टप्प्याला निधी मिळण्याची शक्यता आहे; परंतु सध्यातरी ‘जैसे थे’ काम आहे.
यापूर्वी देखील तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादन यांनी येथील अनधिकृत बांधकामे पोलिस बंदोबस्तात जमिनदोस्त करण्यात आली होती. प्राधिकरणाच्या या जागेवर पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी देखील मत्स्य विभागाने अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या; परंतु झोपडपट्ट्या उभ्या आहेत. अनेक पक्की बांधकामे आणि शेड उभारण्यात आल्या आहेत. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत या जागेवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याने अनधिकृत बांधकामे आजही वाढत आहेत. आता मत्स्य विभागाने कठोर पावले उचलली असून, ३५० जणांना अतिक्रमण हटवण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही बांधकामे काढून टाकण्याचे या नोटिसीमध्ये स्पष्ट केले आहे. अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशाराही मत्स्य विभागाने दिला आहे.