मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने महाड शहरासह तालुक्याला झोडपून काढले. महाड मधील सावित्री, गांधारी आणि काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे तालुक्याचा महाडशी संपर्क तुटला आहे. महाडमध्ये बुधवारी सकाळी सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि नदीचे पाणी सर्व प्रथम सुकट गल्लीत शिरले. पावसाचा जोर कायम असल्याने बघता बघता नदीचे पाणी शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरले. बाजारपेठेत पाणी येत असल्याचे लक्षात येताच दुकानदार, व्यापारी यांची दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धावपळ सुरू झाली.
रायगड रोडवर पाणी जोरदार पडत असलेल्या पावसामुळे महाडमधील गांधारी नदीचे पाणी देखील रोडवर आले होते. गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नदीचे पाणी शहरातील दस्तुरी नाका, परीसरात मोठ्या प्रमाणावर साचले होते. दरम्यान महाड-रायगड रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी भरले असल्याने या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाली होती. वाहनं सुरक्षित ठेवली दोन वर्षापूर्वी आलेल्या महाभयंकर अशा पुरामुळे महाडकरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शहरातील हजारो वाहनं पाण्याखाली गेल्याने त्याचा मोठा फटका वाहन मालकांना बसला होता. तशीच परिस्थिती याही वर्षी उद्भवू नये याची खबरदारी घेत महाडकरांनी आपली वाहनं आधीच सुरक्षित ठिकाणी नेवून ठेवली आहेत. विशेष करुन बुधवारी सकाळी महाड शहरात सर्वत्र पुराचे पाणी भरायला सुरुवात होताच अनेकांनी आपली वाहनं शहरानजीकच्या हायवेवर ऊभी करुन ठेवली. मुंबई- गोवा महामार्गावर सुंदरवाडी आणि करंजखोल तसेच चांभारखिंडनजीक हायवे वर मोटरसायकली आणि फोर व्हीलर वाहनांची मोठी रांग पाहायला मिळाली.