पावसाने राज्यातील रत्नागिरीसह ११ जिल्ह्यात भूस्खलनाचा धोका वाढत चालला आहे. इस्रोने मार्च २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या लँडस्लाईड अॅटलास अहवालात देशातील भूस्खलनाचा अधिक धोका असलेल्या आणि लोकसंख्येची घनता जादा असलेल्या १४७ जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये राज्यातील एकूण ११ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही समावेश आहे. उपग्रहावरील आधारित आणि प्रत्यक्ष उपलब्ध माहिती, छायाचित्रे याद्वारे देशातील भूस्खलनाच्या घटनांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. देशभरात भूस्खलनाच्या घडलेल्या घटनांचाही अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालात राज्यातील ठाणे (८० व्या स्थानी), पुणे (१०७), रायगड (१०९), सिंधुदुर्ग (११४) नाशिक (१२८), रत्नागिरी (१२९), अहमदनगर (१३१), कोल्हापूर (१३३), सातारा (१३४), मुंबई उपनगर (१३९) व मुंबई १४० व्या क्रमांकावर आहे.
भूस्खलन ही मुख्य नैसर्गिक आपत्तीपैकी एक आहे, ज्यामुळे डोंगराळ भागात मोठ्या समस्या निर्माण होतात. मालमत्तेचे, शेतीचे नुकसान होते. याशिवाय दरवर्षी शेकडो लोकांचे बळी जातात. देशात २०१४ पासून भूस्खलनाच्या सुमारे ८० हजार घटना घडल्या आहेत. या अहवालात १७ राज्यांतील १४७ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्हा आहे. दुसऱ्या क्रमांकावरही उत्तराखंडमधील थेरी गढवाल जिल्हा आहे. तिसऱ्या क्रमांकावर केरळमधील त्रिचूर, चौथ्या क्रमांकावर जम्मू-काश्मीरमधील राजापुरी, तर पाचव्या क्रमांकावर केरळमधील पल्लकड जिल्हा आहे. १४७ व्या क्रमांकावरही उत्तराखंडातील उदमसिंगनगर हा जिल्हा आहे.