28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeChiplunकोयना धरणात ५० टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा

कोयना धरणात ५० टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा

कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात जुलै महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असल्याने धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात जुलै महिन्यात जोरदार असा पाऊस पडल्याने कोयना धरणात ५० टीएमसीपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणात ५१.९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरणाची साठवण क्षमता पाहता पाण्याने ४९.३३ टक्के इतकी सरासरी गाठली आहे. त्यामुळे वीजनिर्मितीची चिंता संपुष्टात आली आहे. कोयना धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा मानली जाते. परंतु यावेळी या भाग्यरेषेवर वेगळेच संकट घोंगावू लागले होते. कारण यावर्षी मान्सून लांबणीवर पडला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमालीची घटली होती. जून महिन्यात धरणात फक्त १० टीएमसी इतकाच पाणी साठा राहिला होता.

परिणामी तिसरा आणि चौथ्या टप्प्यातील वीज निर्मिती बंद करण्यात आली होती. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाला आणखी उशीर झाला असता तर वीजनिर्मितीचे मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. तसेच पाणी टंचाईचे संकट आणि सिंचनाचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले. परंतु पावसाला आवश्यक तितका जोर नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. कोयना परिसरात देखील पावसाची सरासरी उत्तम राहिली. त्यामुळे समाधानाचे वातावरण होते. कोयना धरणाची साठवण क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे.

साधारणतः १५ ऑगस्ट पर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाणी साठा पूर्ण होतो. पुढील पावसाचा अंदाज घेता पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु यावेळी १५ ऑगस्टचा मुहूर्त टळणार अशीच चिन्हे दिसत होती. आता मात्र सर्व चिंता संपुष्टात आली आहे. धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणात तब्बल ५१ टीएमसी पाणी साठा झाला आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात जुलै महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असल्याने धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. घरणाची साठवण क्षमता पाहता तब्बल ४९.३३ टक्के इतकी पाण्याची सरासरी राहिली आहे.

पुढील काळात पावसाचा जोर असाच राहिला तर ऑगस्ट महिन्याच्या अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज बांधला जात आहे. धरणातील १०५ टीएमसी पाण्यांपैकी ६७ टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. तर अन्य पाणी पश्चिम महाराष्ट्रात सिंचनासाठी दिले जाते. वीजनिर्मिती नंतर वाशिष्ठी नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या अवजलवर अनेक पाणी पुरवठा योजना अवलंबून असून त्यातून अनेक गावांची तहान भागवली जाते. त्यामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular