केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले आहे. या आधी रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची …कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी हे गरीबांना खुष करताना दिसत आहेत. आता उज्ज्वला लाभार्थीची सबसिडीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे.
म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बुधवारीबैठक पार पडली. सिलिंडरची किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना सिलिंडर मिळत होता. आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सिलिंडर अवघा ६०० रुपयांना मिळणार आहे.
महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी कपात केली होती. यानंतर १ ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत १४.२० किलोचा घरगुती गॅस सिलिंडर ९०२.५० रुपये, दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.