विद्यार्थ्यांचा हल्ली व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाकडे कल वाढतो आहे, नुसतं घोकंपट्टी करून शिकण्यामध्ये सध्याच्या पिढीला स्वारस्य राहिलेलं नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला जातो. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या फिल्डकडे न जाता विद्यार्थी आत्ता पॉलिटेक्निककडे वळू लागले आहेत. कोरोनामुळे परीक्षा, रिझल्ट सगळ्यांनाच विलंब होत असल्याने अखेर पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली आहे.
दहावीच्या निकालाची वाट न पाहता रत्नागिरी पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्याकडे निकाल न लागल्याने अद्याप गुणपत्रिका नसल्याने ऑनलाइन अर्जामध्ये विद्यार्थ्याना केवळ आपला बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. विद्यार्थ्याचे २०२१ वर्षाचे इयत्ता दहावी परीक्षेत प्राप्त झालेले गुण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्राप्त होणाऱ्या निकालाच्या माहितीवरून थेट घेण्यात येणार असून ते संबंधित विद्यार्थ्याच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येणार आहेत.
२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठीच्या इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रती अपलोड करणे, त्यासह कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत आहे. त्यानुसार अर्ज भरणे, कागदपत्र तपासणी, अर्ज निश्चिती आणि अंतिम गुणवत्ता यादी ही सर्व प्रक्रियांचा कालावधी ३० दिवसांची असणार आहे.
यंदापासून मेकॅटॉनिक्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता प्रथम वर्षासाठी ६० इतकी असून, या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत रोबोटिक्स. मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर इंजिनियरिंग, टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग, सिस्टम इंजिनियरिंग कंट्रोल इंजिनियरिंग इत्यादी विविध शाखांमधील महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेच्या मर्यादेमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.