मागील वर्षीच्या रब्बी उन्हाळ कांदा हंगामात नाशिक जिल्ह्यात २ लाख २० हेक्टर क्षेत्रावर लागवडी झाल्या होत्या. मात्र वाढीच्या अवस्थेत रोगप्रादुर्भाव तर एप्रिल-मे महिन्यात काढणीच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे ३५ हजार हेक्टरवर जिल्ह्यात नुकसान झाले होते. त्यामुळे साठवणूक क्षमता यंदा अडचणीत आली. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची कांद्याची साठवणूक केली; मात्र पुढे चाळीत सड झाली. त्यातच साठवणूक होऊन ६ महिने झाल्याने साठवणूक क्षमता संपुष्टात आली. त्यामुळे जिल्ह्यात दैनंदिन आवकेच्या जवळपास ६० टक्क्यांपर्यंत आवक कमी झाली आहे.
एप्रिल-मे महिन्यात काढणीच्या काळातील पाऊस, गारपीट अडचणीची ठरली आहे. त्यामुळे जिवाणूजन्य सड होऊन साठवणूक क्षमतेवर परिणाम झाला. यात सटाणा, कळवण, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगांव, देवळा व निफाड तालुक्यांत नुकसान अधिक होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एप्रिल ते जुलैदरम्यान अधिक प्रमाणात विक्री केली. त्या वेळी उत्पादन खर्चाच्या खाली दर असल्याने कोट्यवधींचा तोटा सोसला आहे. मात्र आता शेवटच्या टप्प्यातील कांदा शिल्लक आहे, अशा थोड्याफार शेतकऱ्यांना दराचा लाभ होत आहे.