बहादूरशेख नाका येथील कोसळलेल्या पुलाचे गर्डर हटवण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूनेही काम सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून परवानगी मिळताच दुसऱ्या बाजूने काम सुरू करून गती देण्यात येईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच पुलाचा काही भाग कोसळला. त्याबरोबर लाँचरही कोलमडून पडले. त्यामुळे खळबळ उडाली होती.
या घटनेची दखल घेऊन राज्य आणि केंद्र शासनाने चौकशी समितीची नियुक्ती केली. त्यानुसार तज्ज्ञ समिती चिपळुणात दाखल झाली आणि पाहणी केल्यानंतर तातडीने अहवालही सादर केला. त्या अहवालाबाबत अद्याप माहिती उपलब्ध नसली तरी कोसळलेले गर्डर हटवण्यासाठी पुणे येथील माते अँड असोसिएट या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. काही दिवसांपूर्वी माते अँड असोसिएट कंपनीची यंत्रणा चिपळुणात दाखलही झाली आणि आता कामाला सुरवात करण्यात आली आहे.
त्यासाठी गुलाठी क्रेनसारखी मोठी यंत्रसामुग्री येथे लावण्यात आली असून, तज्ञ अभियंते व प्रशिक्षित कामगारही तैनात करण्यात आले आहेत. हे अतिशय जिकिरीचे व गुंतागुंतीचे काम असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या गतीने काम केले जात आहे. त्यामुळे गर्डर हटवण्याच्या कामाला किमान एक महिना इतका कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुढील महिनाभरात काम पूर्ण होईल, असा अंदाज राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता आर. पी. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.